Maharashtra Konkan Rain Update Chiplun Received 300 Mm Of Rain In 48 Hours काेकणात पूर इलाे!:चिपळूणला 48 तासांत 300 मिमी पाऊस, 5 हजार लोक पुरात अडकले; विदर्भातही धो-धो पाऊस, तीन जण पुरात वाहून गेले औरंगाबाद19 तासांपूर्वी कॉपी लिंक मेळघाटात 100 गावांशी संपर्क तुटला, नाशिकजवळ कसारा घाटात दरड कोसळली मुसळधार पावसामुळे कोकण जलमय झाले आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात ४८ तासांत तब्बल ३०० मिमी तुफानी वृष्टी झाल्याने चिपळूणसह परिसरातील ७ गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. मदतकार्यासाठी एनडीआरएफचे २३ जणांचे पथक ५ बोटींसह पथक पाठवण्यात आले आहे. राज्यात कोकणासह नाशिक जिल्ह्यात आणि विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही धो-धो पाऊस झाला. शहरात पडलेला ३०० मिमी पाऊस, कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे चिपळूणला पुराच्या पाण्याने वेढा घेतला आहे. सुमारे ५ हजार नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. महाडमध्ये ७२ जण बेपत्ता झाल्याची भीती : रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळई गावात गुरुवारी दरड कोसळून ३० घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळाली असून एकूण ७२ नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. भोर-महाड मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आलाय. विदर्भात तिघे गेले पुरात वाहून नागपूर | वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यात बैलगाडीसह दोघे जण वाहून गेले. तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात एक जण पुरामध्ये वाहून गेला आहे. मेळघाटात संततधार सुरू असल्याने सिपना नदीला पूर आला आहे. परिणामी मेळघाटातील १०० गावांचा तुटला संपर्क आहे. तर अचलपूर-बऱ्हाणपूर मार्गावरील वाहतूक ३ तास विस्कळीत झाली होती. पूर्णा धरणाचे ९, सापन धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग जोरात सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात दहिगाव रेचा येथे नदीची संरक्षण भिंत कोसळली व काही घरांची पडझड झाली. अकोला शहरात पाणीच पाणी, मात्र पाणीपुरवठा ठप्प अकोला शहरात २४ तासांत २०२.९ मिमीची तर जिल्ह्यात सरासरी ८०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मोर्णा नदीला पूर आला असून १७५ नागरिकांना रेस्क्यू टीमने सुरक्षित स्थळी हलवले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून जिल्ह्यात २,२३७ घरांचे नुकसान झाले. दरम्यान, एकाचा मृत्यू झाला असून कोंबड्यांसह १५३ जनावरे दगावली. तसेच पिकांनाही मोठा फटका बसला असून ६२०० हेक्टरवर नुकसान झाले आहे. या पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील वॉश वॉटर पंप पाण्यात बुडाल्याने अकोला शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प राहणार आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील पारवा (बु.) परिसरात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील कुंभी वनपरिक्षेत्रात धरण फुटले. भिंतीला तडा गेल्याने भराव वाहून गेल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. १६ तास रेल्वेचा खोळंबा, १२ गाड्या रद्द नाशिक | घाटमाथ्यावर गत चार ते पाच दिवसांपासून धुवाधार पाऊस होत आहे, बुधवारी रात्री कसारा घाटात पावसामुळे दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे १२ गाड्या रद्द करण्यात आल्या. या नाशिक रोड, देवळाली कॅम्प, इगतपुरी रेल्वेस्थानकापर्यंत धावल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांनंतर अवघ्या १६ तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. बातम्या आणखी आहेत...